२,५०० छत्र्यांचे कास येथे लोकार्पण; प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पावसाळ्यात पावसात भिजणाऱ्या गरीब, गरजू आणि निराधार बांधवांच्या वेदना ओळखत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र समूहातर्फे २,५०० छत्र्यांचे वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचा लोकार्पण कार्यक्रम खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कास येथे पार पडला.
यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, गरजू लोकांच्या डोक्यावर सावली देणाऱ्या या छत्र्यांची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि तळमळ आहे. मनोज शेंडे व त्यांच्या मित्र समूहाने दाखवलेला जिव्हाळा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, आपल्या छोट्या प्रयत्नातून गरजूंना दिलासा मिळावा, हीच आमची इच्छा आहे. समाजातील कुणीही उपेक्षित राहू नये, यासाठी मित्र परिवारासह आम्ही पुढेही असेच उपक्रम राबवत राहू. आमच्या कार्याला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याबद्दल खासदार उदयनराजे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे सांगून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ. रंजना रावत, सौ. सुजाता राजेमहाडिक, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, पंकज चव्हाण, सौ. शिवानी कळसकर, माजी सभापती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, राम हदगे, राजू भोसले, सागर पावशे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You must be logged in to post a comment.