अक्षय नलावडे याच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप; डॉक्टरांचे स्पष्टीकरण

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर अक्षम्य हलगर्जीपणाचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर हॉस्पिटलसमोर तणाव निर्माण झाला. यानंतर डॉक्टर भूषण पाटील यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत सांगितले की, सदर युवकाचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच झाला होता.
डॉक्टर पाटील यांनी सांगितले की, २७ डिसेंबर रोजी अक्षय नलावडे याला हृदयविकाराचा त्रास होत असल्याने मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओग्राफी केली असता रिपोर्ट नॉर्मल आला, मात्र रुग्णाचे हृदय कमकुवत असल्याचे निदान करण्यात आले. त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, परंतु नातेवाईकांनी आर्थिक अडचणींचा हवाला देत डिस्चार्जचा आग्रह धरला. त्यामुळे रुग्णास दोन दिवस उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

गुरुवारी दि.२ जानेवारी रोजी सकाळी पुन्हा त्रास होऊ लागल्याने नातेवाईक रुग्णास हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता. आम्ही ही माहिती नातेवाईकांना दिली, मात्र त्यांनी आमच्यावर आरोप करत गोंधळ घातला, असे डॉक्टर भूषण पाटील यांनी स्पष्ट केले.

You must be logged in to post a comment.